छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महापुरुष म्हणजे आपल्या यशासाठी मोठे प्रेरणास्त्रोतच ठरतात. विविध महापुरुषांच्या आचार आणि विचारांनी आपण आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर प्रत्येक कार्यासाठी नवी उमेद मिळते. आजच्या या लेखांमध्ये आपण राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…

Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र (पार्श्वभूमी)

आज कुठेही अन्याय अत्याचार होताना दिसला की आपण सहजच “काय मोगलाई माजलीय काय?” असे म्हणतो मात्र मोगलाई माजणे म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अर्थातच 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 17 व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्र भूमी सह भारतात अनेक मुघल राजे होऊन गेले. त्यांची खासियत म्हणजे जनतेवर अन्याय अत्याचार करून त्यांना सतत धाकात ठेवणे हे या राजांचे गुणधर्म.

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवून मुघल साम्राज्य, गोवळकोंडा ची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्ती यांसारख्या वाईट शक्तीं ना निस्तनाबूत करून त्यांची मुसकी आवळली आणि जनतेसाठी एका कल्याणकारी राज्याची निर्मिती केली.

शिवजन्म

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. ते विजापूरच्या दरबारी सरदार होते. विविध आख्यायिका नुसार शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरी या किल्ल्यानुसार शिवाजी तर काही व्यक्तींच्या नुसार किल्ल्यावरील शिवाई देवी ला मासाहेब जिजाऊंनी “माझ्या पोटी एक बलवान पुत्र जन्म घेऊ दे आणि त्याने परकीय शक्तींपासून महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देऊ दे” अशी प्रार्थना केली होती, म्हणून शिवाजी नाव ठेवल्याचे सांगितले जाते.

शिवाजी महाराज हे भोसले कुटुंबातील मराठा राजा होते त्यांना पिढीजात लढाऊ वृत्तीचा वारसा मिळाला होता. त्यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सरदार होते. तेथील त्यांच्या कर्तबगारिवर त्यांना राजा ही उपाधी प्रधान करण्यात आलेली होती.

तसेच त्यांना पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण या प्रदेशातील देशमुखी देण्यात आली होती. आणि वास्तव्य करण्यासाठी शिवनेरी किल्ला देखील सोपविण्यात आला होता. त्यानंतर शहाजीराजे देखील त्यांच्या पाठोपाठ विजापूरच्या सेवेत रुजू झाले. त्यांनी देखील पुढे आपल्या कर्तबगारिने पुणे जहागिरी मिळवली.

स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा

बालपणापासूनच आई मासाहेब जिजाऊंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर होते. अन्यायाविरुद्ध त्यांना स्वस्थ बसता येत नव्हतं. बालपणापासूनच त्यांच्या नजरेसमोर नागरिकांवर होणारे अनन्वित अत्याचार त्यांना सहन होत नव्हते. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसोबत मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या करंगळीच्या रक्ताने अभिषेक करत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. आणि अवघा मावळ प्रांत बघता बघता छत्रपतींच्या या श्री कार्यात सहभागी झाला.

या कार्यात त्यांना तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, सोनोपंत डबीर, बापूजी मुदगल, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे यांसारख्या मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वांची साथ लाभली.

स्वराज्याचे तोरण

पूर्वीच्या काळी राज्यकारभारासाठी पुरेशी फौज आणि भक्कम असे किल्ले फार गरजेचे असत. छत्रपतींनी जीवाला जीव देणारे मावळे एकत्र करून फौज तर उभा केली मात्र त्यांच्यापाशी गडकिल्यांची कमतरता होती, म्हणून त्यांनी आपल्या सवंगड्यांसमवेत मिळून सर्वात आधी तोरणा हा भक्कम किल्ला जिंकून स्वराज्याचे जणू तोरणच उभारले असे म्हणले जाते.

स्वराज्याची घोडदौड

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात अनेक किल्ले जिंकून घेतले, काही नवीनही बांधले. आणि सर्वांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला वाहूनच घेतले होते.

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात अगदी कोकणापासून पूर्वेला अगदी नागपूरपर्यंतही, उत्तरेच्या दृष्टीने बघता खानदेश पासून दक्षिणेला तंजावर पर्यंत आपल्या स्वराज्याच्या साम्राज्याचा विस्तार केला होता. त्यांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंगांपैकी पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, अफजलखानाशी दोन हात, आग्र्यावरून सुटका, सुरतेची लूट, दक्षिण मोहीम यांसारखे धाडसी प्रसंग वाचताना किंवा चित्रपटात बघताना आजही अंगावर शहारे उभे राहतात.

आपल्या मुठभर सैन्याच्या जीवावर त्यांनी शत्रूच्या बलाढ्य फौजेला नामोहरम करून टाकले होते. आयुष्यभराच्या अथक परिश्रमानंतर जनतेचे कल्याणकारी राज्य अर्थात स्वराज्य उभे राहिले होते. याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांना देत. जनतेने त्यांना आपला राजा म्हणून स्वीकारले होते. मात्र त्यांनी स्वराज्याची कीर्ती साता-समुद्रापार पसरविण्यासाठी राज्याभिषेक करविण्याचे ठरविले.

राज्याभिषेक

मित्रांनो छत्रपतींनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर प्रचंड भूप्रदेश आणि सत्ता संपादन केली होती. मात्र ते अजूनही विजापूरच्या जहागीरदाराचे पुत्र म्हणूनच ओळखले जात. त्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करण्याचे ठरविले. राज्याभिषेकासाठी 1673 पासूनच जोरदार तयारीची सुरुवात झाली होती. मात्र वादग्रस्त समस्यांमुळे हळूहळू राज्याभिषेकांची तारीख पुढे ढकलत पूर्ण एक वर्षानंतर राज्याभिषेकाची तारीख ठरली.

काही ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार छत्रपती हे क्षत्रिय वंशाचे नसून शूद्र वंशाचे आहेत त्यामुळे त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही, असे काही ब्राह्मणांनी मत मांडले. त्यामुळे वाराणसी चे पंडित गागाभट्ट या पुरोहितांना बोलविण्यात आले. त्यांच्यानुसार छत्रपती हे क्षत्रिय वंशाचेच असून गागाभट्टांनी हे सिद्ध करणारी वंशावळही सादर केली. आणि शिवराज्याभिषेक समारंभाचा मार्ग मोकळा झाला.

काही संदर्भानुसार संपूर्ण कार्यक्रम, भोजन, दीक्षा, दाग दागिने, सिंहासन, सजावट, पाहुण्यांची सरबराई यासाठी एकूण दीड दशलक्ष रुपयांपर्यंत खर्च आला. आणि अखेर 6 जून 1674 रोजी महाराजांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांना गागाभट्ट यांच्या हाताने सिंधू, यमुना, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात नद्यांच्या पवित्र जलाने भरलेल्या सुवर्णपात्रातून अभिषेक करण्यात आला.

सोबतच वैदिक मंत्रांचा देखील घोष करण्यात आला. तदनंतर शिवाजी राजांनी मासाहेब जिजाऊंना चरणस्पर्श करून वंदन केले. शिवाजी महाराज शककर्ते म्हणजेच एका नवीन युगाचे संस्थापक राजे झाले. त्यांना हिंदत्व धर्मोद्धारक म्हणजेच हिंदू धर्माचे रक्षक अशी पदवी देण्यात आली.

स्वराज्यातील पोकळी

शिवाजी राजे मासाहेब जिजाऊंना आपले गुरु मानत. स्वराज्याच्या उभारणीत मासाहेब जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. शिवरायांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा विविध ऐतिहासिक गोष्टींच्या माध्यमातून देण्याचे कार्य या माऊलीने केले. मात्र वृद्धापकाळाने राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांतच म्हणजेच 18 जून 1974 रोजी मासाहेब जिजाऊंचे निधन झाले. त्यामुळे छत्रपतींच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

राजे आयुष्यभर महाराष्ट्र जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबासही तेवढ्याच प्रेमाने वाढविले. महाराजांना अनेक पत्नी होत्या त्यांनी देखील स्वराज्य स्थापनेच्या पवित्र कार्यात महाराजांना मोलाची साथ दिली. महाराजांचा सर्वात पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्यासोबत झाला होता. सोबतच सोयराबाई मोहिते, सकवारबाई गायकवाड, पुतळाबाई पालकर, सगुनाबाई शिंदे, काशीबाई जाधव, लक्ष्मीबाई विचारे, गुणवंतीबाई इंगळे यादेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. शिवरायांना सईबाई या पत्नीपासून छत्रपती संभाजी महाराज तर सोयराबाई या पत्नीपासून राजाराम महाराज असे दोन पुत्र प्राप्त झाले होते. तसेच शिवरायांना काही कन्या देखील होत्या.

शिवरायांच्या निधनापूर्वीच 1659 मध्ये सईबाई यांचे निधन झाले होते. तर राज्याभिषेकापूर्वी काशीबाई यांचे निधन झाले होते. तसेच पुतळाबाई या शिवरायांसोबत 1680 मध्ये सती गेल्या होत्या. शिवरायांच्या नंतर म्हणजेच 1681 मध्ये संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सोयराबाई यांनी देह त्यागला. तर सकवार बाई या पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत स्वर्गवासी झाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांची गणना अतिशय चाणाक्ष आणि हुशार राजांमध्ये केली जाते. बलाढ्य अशा मोगली साम्राज्याविरुद्ध अगदी मुठभर सैन्याच्या जीवावर विजय प्राप्त करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही, यासाठी शिवरायांच्या सुपीक डोक्यामध्ये पश्चिम घाटाचा पुरेपूर कसा वापर करावा याची एक ना एक योजना तयार असे.

सह्याद्री कोकण आणि मध्य महाराष्ट्राला जोडणारा अगदी डोंगराळ दुर्गम भाग आहे, ह्यात गनीमाला गाठून ठेचण्याची कला फक्त आणि फक्त शिवरायांच्याच मावळ्यात दिसते, यालाच गनिमी कावा असे म्हटले जाते.

महाराष्ट्रावर आपले राज्य कायम ठेवायचे असेल तर समुद्र तटावरही अभेद्य असे किल्ले आणि नौदल असावे, असे शिवरायांच्या शोधक बुद्धी आणि दूरदृष्टीने बरोबर हेरले होते. त्यामुळे त्यांनी भारतातील प्रथम नौदलाची स्थापना केली. आणि विविध जलदुर्ग देखील बांधले. म्हणूनच त्यांना “भारतीय नौदलाचे संस्थापक/जनक” अर्थात “फादर ऑफ इंडियन नेव्ही” असे म्हटले जाते.

महाराजांनी आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अनेक वाईट शक्तीचा पराभव करून स्वराज्य निर्माण केले होते. आयुष्यभराच्या अखंड घोडदौडीनंतर छत्रपती इसवी सन १६८० मध्ये मार्च महिन्यात हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आजारी पडले. आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. आणि 3 एप्रिल 1680 रोजी स्वराज्याची धगधगती तोफ वैकुंठ लोकी गेली.

छत्रपतींनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेले कार्य फार बहुमूल्य आहे ज्याची परतफेड आजची पिढी देखील करू शकत नाही. अशा या महान राजाला मानाचा त्रिवार मुजरा!!!
जय शिवाजी! जय भवानी!! जय महाराष्ट्र!!!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment