संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi

Sant Eknath Maharaj Information In Marathi काय करिसी काशी गंगा। भीतरी चांगा नाही तो।। मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथे अनेक संत महात्मे होऊन गेले आजच्या भागामध्ये आपण संत एकनाथ महाराज यांच्या विषयी माहिती बघणार आहोत.

Sant Eknath Maharaj Information In Marathi

संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi

एकनाथांचा जन्म 1533 साली पैठण येथील एका ऋग्वेदी वामन कुटुंबात झाला. त्यांचे वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी होय. बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने एकनाथ हे अनाथ झाले. आई-वडिलांच्या पश्चात त्यांचे आजोबांनी त्यांचा सांभाळ केला व आजोबांच्या छत्रछायेत त्यांच्यावर सुयोग्य असे संस्कार झाले. एकनाथांना बालपणापासूनच अध्यात्म आणि हरी किर्तन यांची एक अनामिक ओढ होती.

वय वर्षे 12 असताना संत एकनाथ यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामी यांचे कडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि तिथे तब्बल सहा वर्षे वास्तव्य करून संस्कृत शास्त्र पुराण यांच्याबरोबरच ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र धर्मग्रंथांचे देखील अध्ययन केले. त्यांना गुरूंच्या कृपेने परमेश्वराचा साक्षात्कार झाला पुढे त्यांनी सात वर्षांपर्यंत तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेत सुरुवातीचे काही दिवस जनार्दन स्वामी यांनी त्यांची सोबत दिली.

पुढे तीर्थयात्रा पार पडल्यानंतर मात्र संत एकनाथांनी गृहस्थाश्रमाचा मार्ग स्वीकारला आणि ते गिरीजाबाई नावाच्या त्यांच्या पत्नीसोबत विवाहबद्ध झाले. त्यांच्यापासून एकनाथांना हरीपंडित हा मुलगा तसेच गोदा आणि गंगा या नावाच्या दोन गोड मुली झाल्या. प्रपंचासह परमार्थ कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ होय. संसार करतानाही अध्यात्म आणि परमार्थाची कास पकडून चालता येते हे संत एकनाथांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले.

संत एकनाथ यांनी पुढे आळंदी या तीर्थक्षेत्री जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे काम केले. तसेच संत ज्ञानेश्वरांच्या भागवत संप्रदायाची कार्य अधिक व्यापकही केले. संत एकनाथ हे जातीभेदाच्या अगदीच विरुद्ध होते, त्यासाठी ते आयुष्यभर झटले त्यांनी आपल्या साहित्यातून मनोरंजना सह अखिल मानव जातीसाठी प्रबोधन करण्याचे कार्य देखील केले. ते स्वतःस “एका जनार्दनी” असे म्हणत. हीच त्यांची नाम मुद्रा आहे.

संत एकनाथ एक उत्तम साहित्यकार होते. त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथलेखन केलेले आहे. त्यामध्ये टिकायुक्त ग्रंथ, अध्यात्मिक काव्य, आख्यान, काव्य, अभंग, भारुडे, गवळणी या प्रकाराचा समावेश होतो. चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थरामायण हे संत एकनाथांच्या उत्तम लेखणीचे काही सुंदर नमुने. त्यांनी महाराष्ट्र राज्यासह देशभर भारुड हा काव्यप्रकार रुजविला.

संत एकनाथांचा कल हा उदारमतवादाकडे व समन्वय वादाकडे झुकलेला आढळून येतो. त्यांना नेमस्त संप्रदायाचे जनक देखील मानले जाते. आनंद अनुभविण्याचे सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती आणि संत महात्म्यांचा सहवास असे संत तुकाराम आवर्जून सांगत.

संत एकनाथांच्या साहित्य वाणीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा बोली भाषेत ते साहित्य निर्मिती करत. त्यांना प्राणीमात्रांबद्दल विशेष दया होती. त्यांचा भूतदयेवर प्रचंड विश्वास होता. मात्र समाजातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड यांपासून समाजाला सज्ञान बनविण्यासाठी त्यांनी बोली भाषेत भारुड आणि गवळणी लिहून जन माणसांचे प्रबोधन केले.

सत्वर पावगे मला । भवानी आई रोडगा वाहीन तुला ।।

हे त्यांचे भारुड रोडगा या नावाने प्रसिद्ध आहे. ज्यात त्यांनी त्या काळातील स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. या भारुडातून आपल्याला स्त्रियांच्या मनाची कल्पना करता येऊ शकते. आजही संत एकनाथांची भारुडे महाराष्ट्रात तेवढीच लोकप्रिय आहेत. भारुड हा शब्द बहुरूड या शब्दापासून अपभ्रंशीत झाला असावा असे मानले जाते. त्यांचे विंचू चावला हे भारुड तर आजही ताजेच वाटते. त्यांनी आपल्या संपूर्ण हयातीत तब्बल 125 विषयांवर 300 पेक्षाही अधिक भारुडे लिहिली. तसेच गवळणीही लिहिल्या.

वरियाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।।

ही त्यांची गवळण विशेष गाजली. या गवळणीतून राधेचे प्रतीकात्मक रूप घेऊन अखिल एकनिष्ठ स्त्री जातीचे वर्णन केले आहे. आजही कीर्तन भजनात संत एकनाथांच्या गवळणी विशेष लोकप्रिय आहेत. संत एकनाथ आपल्या काव्यातून अनेक प्रसंगांचे सुंदर असे वर्णन करीत.

गोदावरी उत्तम तिरी । चौ योजनांचा चंद्रगिरी ।।

ही काव्यपंक्ती त्याचा एक उत्तम नमुना होय. या काव्यपंक्ती बद्दल अधिक सांगायचे म्हणजे संत एकनाथ ज्यावेळी गुरु जनार्दन स्वामी यांच्या समवेत तीर्थयात्रेस निघाले होते त्यावेळी दोघेही गोदावरी काठच्या चंद्रावती या गावी आले. आणि चंद्रभट्ट या ब्राह्मणाच्या घरी मुक्कामास उतरले चंद्रभट्ट हा ब्राह्मण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी प्रवचन करत असे. त्यादिवशीही चंद्रभटांनी चतुश्लोकी भागवत यावरील कीर्तन केले.

ते दोन्ही गुरु शिष्यांनी ऐकले दोघांचेही विचार चंद्रभट्ट यांचे सोबत जुळल्याने पुढे तिघे देखील तीर्थयात्रेस निघाले. पुढे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे गुरु जनार्दन यांनी संत एकनाथ यांना चंद्रभट्ट यांच्या चतुश्लोकी भागवत यावर टीका करण्यास सुचविले व तिथेच संत एकनाथांनी चतुश्लोकी भागवतावरील टीकाग्रंथ लिहून पूर्णत्वास नेला.

संत एकनाथांच्या मते परमेश्वर हा काही फक्त समजण्याचा विषय नाही तर तो नितांत श्रद्धा उपासना आणि आचरणाचा विषय आहे असे ते नेहमी म्हणत. संसाराचा त्याग करून भगवी वस्त्रे घातली आणि भस्माने अंग माखून घेतले म्हणजे कोणी साधुसंत झाला असे होत नाही. त्यासाठी संसार न सोडता ही मनोभावे ईश्वराची पूजा केली तर आपल्याला अध्यात्माची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही असे ते नेहमी म्हणत. आणि हेच त्यांनी आपल्या आचरणातूनही दाखवून दिले. याविषयी संत एकनाथांनी आपल्या काव्यपंक्तीत खूप सुंदर रित्या लिहून ठेवले आहे की,

जग राम राम म्हणे ।तया का न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव । नामी नाही अनुभव ।।

माणसाला गुरु असल्याशिवाय गुरु मंत्र मिळणे शक्य नाही. गुरु मंत्र नामस्मरणाने परमेश्वराची प्राप्ती होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सर्वप्रथम गुरूस शरण गेल्याशिवाय ईश्वराचा मार्ग मोकळा होत नाही असे ते नेहमी म्हणत.

संत एकनाथांचा मानवी मनाविषयी फार गाढा अभ्यास होता.

आपुले कल्याण इच्छेने जयाशी । तेने या नामासी विसंबू नये ।।

अर्थात चांगल्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती दडलेली असते. जसे आपले विचार आणि अचार असतात त्याचप्रमाणे फळे आपल्याला मिळत असतात. जेव्हा आपण परमेश्वराच्या नामस्मरणाशी लीन होतो त्यावेळी परमेश्वरही आपल्याला प्रत्यक्षपणे सहकार्यच करत असतो.

तेराव्या शतकाच्या सुमाराच्या सुरुवातीस संत ज्ञानेश्वर नामदेव यांसारख्या संतांनी भक्तिमार्गाची सुरुवात केली. त्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. त्यांनी भागवतभक्ती या पंथाची शास्त्रीय पद्धतीने स्थापना केली.

संत एकनाथ आयुष्यभर समाजाच्या प्रबोधनासाठी झटत राहिले. अशा या महान व्यक्तिमत्वाने 25 फेब्रुवारी 1599 अर्थात मराठी वर्षानुसार फाल्गुन वैद्य षष्ठी शके 1521 मध्ये या जगाचा अखेरचा निरोप घेऊन वैकुंठास आपले प्रस्थान ठेवले. संत एकनाथ यांच्या समरणार्थ फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्टीस एकनाथ षष्ठी असे देखील म्हटले जाते. या दिवशी पैठण या त्यांच्या जन्म गावी प्रचंड जनसागर संत एकनाथांच्या दर्शनासाठी एकत्र येतो. अशा या थोर संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्याला जन्म घेण्याचे भाग्य लाभले याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.
मित्रानो संत एकनाथ यांच्यावरील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, धन्यवाद

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment